मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. मात्र या सुनावणीत न्यायालयाने तुर्तास आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे. पुढील सुनावणी आता जानेवारी होणार आहे. मात्र आता यावरून विरोधी पक्षाकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे.
रोहितगींसह सर्व सहकाऱ्यांनी जोमाने बाजू मांडली. पण बाजू मांडत असताना पुढची तारीख का मागितली हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजला नाही. पुढची तयारी करायची म्हणून पुढची तारीख मागितली का?, असा सवाल खासदार संभाजीराजेंनी विचारला आहे.
राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत संभाजीराजे म्हणाले की, माझी सरकारला विनंती आहे, मुलांचं फार नुकसान होतंय. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. त्यांना पुढे काय करायचं कळत नाहीये. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल याबाबत सरकारनं निर्णय घ्यावा.
लवकरच आपण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची देखील माहिती खासदार संभाजीराजेंनी दिली. याशिवाय आता पुढे काय करायचं हे सरकारने सांगावे, अशी विनंती देखील त्यांनी केली.