नवी दिल्ली : जनता दल युनायटेडचे नेते हरिवंश सिंह यांची पुन्हा एकदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात आरजेडीचे उमेदवार आणि खासदार मनोज झा यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक पार पडली.
सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनी आपले उमेदवार दिले होते. एनडीएकडून पुन्हा एकदा जेडीयू नेते हरिवंश नारायण सिंह यांना उमेदवारी मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी अर्ज भरला होता. राज्यसभेत खासदार होण्याआधी हरिवंश नारायण सिंह हे एक पत्रकार होते. हरिवंश नारायण यांचा जन्म जयप्रकाश नारायण यांच्या सिताब या गावी झाला. समाजवादी विचारधारेचे ते प्रणेते आहेत. वाराणसीतून त्यांनी शिक्षण घेतलं. त्याच काळात ते जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी जोडले गेले होते.
हरिवंश यांची निवड उपसभापतीपदी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. एक पत्रकार, एक समाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. सदनात ते कशाप्रकारे काम करतात ते आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. हरिवंश यांचे सगळ्या पक्षांशी चांगले संबंध आहेत. त्यांनी निष्पक्ष पद्धतीने सदनाची कारवाई केली आहे. ते एक उत्तम पंच आहेत. येत्या काळातही ते त्यांची भूमिका अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडतील याची मला खात्री वाटते आहे. ते त्यांचं कर्तव्य पार पाडतील असंही मोदी यांनी म्हटलं आहे.