राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी २ जुलै रोजी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी या सर्व बदल्या रद्द केल्या. या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा निर्णय रद्द केल्यामुळे सरकारमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव समोर आला. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करून हे गैरसमज दूर केले.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलांच्या निर्णयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते. त्यामुळे त्यांनी परमवीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याने परमवीर सिंग यांची बदली टळली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमवीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मातोश्रीवर झालेल्या बैठकीत बदली न करण्याचा निर्णय झाला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना न विचारताच मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यांना अंधारात ठेवून वाहनांसाठी 2 किमी लक्ष्मणरेषेचा आदेश दिला होता. तसेच मुख्यमंत्र्यांना माहिती न देताच परस्परच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शहीदाचा दर्जा देण्याचा निर्णय झाला होता. मुंबई पोलीस आयुक्तांनी तीन महत्त्वाचे निर्णय न विचारता घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते.