मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. तर महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का ? हा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. काँग्रेस नेत्यांकडून महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले जात आहे.
यातच आता मुंबई महापालिकेवर आमच्या मदतीशिवाय महापौर बसूच शकत नाही, असे म्हणत काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एकप्रकारे शिवसेनेला इशाराच दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील असा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने राज्यात आगामी काळात होणाऱ्या सर्वच महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अस्लम शेख म्हणाले की, गामी काळात काँग्रेसच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर बसू शकत नाही. येत्या काळात जिल्हानिहाय वॉर्ड ऑफिस कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे.
मुंबईत काँग्रेसचा विस्तार झाला पाहिजे. अन्यथा मला पाच वर्षे मंत्रिपदावर राहण्याचा हक्क नाही, असेही ते यावेळी म्हणाले.