नागपूर : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयकडून जोरदार तपास सुरु आहे. ड्रग माफिया संदर्भातील अनेक धागेदोरे हाती लागताच सोबीआयने त्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचे सीबीआयला पूर्ण सहकार्य आहे. आता या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी वेगळा तपास करण्याची गरज नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हंटले आहे.
सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने मुंबईत ड्रग्ज माफियांवर कारवाई केली. याउपर मुंबई पोलीस या प्रकरणात वेगळी चौकशी करणार आहे की सीबीआयला सहकार्य करणार आहे, या प्रश्नावर गृहमंत्री देशमुख यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.
ड्रग्जचे येवढे मोठे घबाड सीबीआयने मुंबईत पकडले आणि कारवाई केली. मग मुंबई पोलिसांना याबाबत यापूर्वी काहीच माहिती नव्हती का, असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारला असता, त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. त्यामुळे सीबीआय मुंबईत जर ड्रग्ज माफियांवर कारवाई करू शकते, तर ड्रग्ज माफिया आजपर्यंत मुंबई पोलिसांच्या रडारवरही का आले नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांनी सर्वोत्कृष्ट काम केले असल्याचे देशमुख यांनी यापूर्वीच सांगितले आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलॅंड यार्ड पोलिसांसोबत होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केलेला आहे.