मुंबई : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सुरु होण्याची शक्यता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी वर्तवली आहे. यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून लोकल प्रवासासाठी वेट अँड वॉच करणाऱ्या सर्वसामान्यांना लवकरच प्रवास करता येणार आहे.
नुकतंच रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या लोकलची संख्या वाढवली आहे. यानंतर आता राज्य सरकारकडून अॅक्शन प्लॅन राबवला जात आहे. राज्य सरकारकडून स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (Sop) करण्यात आला आहे. या SOP नुसार रेल्वेसेवा वेळापत्रकही निश्चित केलं जाईल, असेही अस्लम शेख म्हणाले.
मुंबईची लोकल सेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता पालकमंत्री असलम शेख यांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांनीही लवकरच लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होईल, असे म्हटले आहे
मुंबई लोकल ट्रेन लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे. येत्या 29 जानेवारी किंवा 1 फ्रेबुवारीपासून ही लोकल सर्वांसाठी सुरु होण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जर ट्रेन सुरु झाली तर लोकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर जेवढा शक्य असेल तेवढा करावा, असे किशोरी पेडणेकरांनी सांगितले.
येत्या शुक्रवारी 29 जानेवारीपासून पश्चिम रेल्वेच्या सर्व लोकल रुळावर धावणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेकडून दिवसाला 1201 फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र, आता त्यामध्ये 166 फेऱ्यांची भर पडून पश्चिम रेल्वेवर पूर्ण क्षमतेने म्हणजे 1,367 फेऱ्या चालवल्या जाणार आहे.
सोमवारीच मुंबईतील उपनगरीय लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली होती. करोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून संपला नसल्याने गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरू करता येऊ शकते, यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली होती.
त्यानंतर लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. या बैठकीनंतर वेगाने हालचाली होत असल्याचेच संकेत पश्चिम रेल्वेच्या निर्णयातून दिसत आहेत.
सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा बहाल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून होणार आहे. त्यामुळे याबाबतचे राज्य सरकारचे म्हणणे विचारात घेऊन रेल्वेकडून येत्या काही दिवसांत अंतिम होण्याची दाट शक्यता आहे. चेन्नईच्या धर्तीवर मुंबईत सर्वांसाठी लोकल सेवा सुरू होणार की अन्य पर्याय असणार, हे सुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे. लोकलसेवा पूर्ववत झाल्यास दूरच्या उपनगरांतून मुंबईत दररोज येजा करणाऱ्या नोकरदार व अन्य प्रवाशांना मात्र खूप मोठा दिलासा मिळेल.