नागपूर : नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बदलीनंतर नागपूरकरांना भावपूर्ण निरोप दिला आहे. मुंढेंच्या बदलीचा घोळ राज्य सरकारकडून निस्तारेनासा झाला आहे. त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सचिव पदावर बदली करण्यात आली होती. ती बदली पुन्हा रद्द करण्यात आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या मुंढे यांच्याकडे तूर्त कुठलाही पदभार नाही मात्र, शुक्रवारी सकाळी मुंबईला रवाना होणाऱ्या या अधिकाऱ्याला निरोप देताना नागपूरकरही भावूक झाले. मुंडेंनीही फेसबूक पोस्ट लिहून नागपूर शहर व पालिकेला अलविदा केला आहे.
आपल्या सात महिन्यांच्या नागपुरातील कारकिर्दीत जानेवारीचा शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारी महिना सोडला तर मुंढेंचा जास्तीत जास्त वेळ कोरोनाशी लढण्यातच गेला. त्यांनी स्वतः रस्त्यांवर उत्तरून जनतेला कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगितले. कोरोनाचा शिरकाव नागपुरात झाल्यानंतर लॉकडाऊन घोषित केल्यावर सुरुवातीच्या दिवसांत मुंढे रोज शहराच्या वेगवेगळ्या भागांत स्वतः फिरायचे. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना आवाहन करायचे, न ऐकल्यास थेट कारवाई करायचे. आज त्यांच्या आयुक्तांच्या निवासस्थानासमोर जमलेले सर्वच्या सर्व लोक मुंढेंचे समर्थक होते, यात तिळमात्रही शंका नाही. पण ज्यांच्या समर्थनार्थ लोक एकत्र आले, त्यांनी दिलेल्या शिकवणीचे भान या लोकांनी ठेवायलाच पाहिजे होते.
दरम्यान ‘जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जेथे कुठे असेल, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला गुड बाय आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल थँक यू. अलविदा…!’, असे म्हणत त्यांनी नागपूरकरांचा भावूक शब्दांत निरोप घेतला. मुंढे ज्यावेळी मुंबईला जाण्यासाठी निघाले त्यावेळी नागपूरमध्ये त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. नागपूरकरांना त्यांनी हात जोडून नमस्कार केला व त्यांचा निरोप घेतला. गुरुवारपासूनच त्यांना निरोप व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस फौजफाटाही सज्ज होता.