बीड : शरद पवारांचे आत्मचरित्र वाचावं की न वाचावं असा प्रश्न पडलाय, कारण पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रमध्ये म्हटलंय की मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, अडत असो वा हमाली ही शेतकऱ्यांकडून घेतली नाही पाहिजे. कुणालाही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता आला पाहिजे. आता दुसरीकडं पवार म्हणतात माझा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी केली होती.
त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले असून, सदाभाऊंनी आधी कोंबड्यांचे कुक्कुटपालन कसे करायचे याचा अभ्यास करावा, असा टोला लगावला आहे.
‘सदाभाऊ, तुम्ही साहेबांच आत्मचरित्र वाचण्याआधी, कडकनाथ कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा..’, असा खोचक टोला बीड जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह पंडित यांनी लगावला आहे.
तसेच प्रवीण दरेकर यांनी राजू शेट्टी हे अजूनही स्वत:ला शेतकरी नेते समजतात. हे खूळ त्यांच्या डोक्यात आहे. शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्यामुळे त्याची डागडुजी करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. शेट्टी यांचे लक्ष्य आता केवळ विधानपरिषदेतील आमदारकी असल्याची घणाघाती टीका, दरेकरांनी केली आहे.