मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे 10 पेक्षा अधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा दावा केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याने भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे.
भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. योग्य वेळी त्यांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करतील, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक म्हणाले की, आमचे काही आमदार पक्ष सोडून गेले होते. महाराष्ट्रात भाजपला उतरती कळा लागली असून, आता काही आमदार राष्ट्रवादीत येण्यासाठी चर्चा करत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करतील.
कोण येणार, किती जण येणार याची माहिती लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करतील, असेही मलिक म्हणाले.