कोकणातील गणेशोत्सवासाठी प्रवासाबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नेतृत्त्वात बैठक पार पडली. या बैठकीला राणे कुटुंबीयांनी आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्यावरुन नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ‘गणेश चतुर्थीसाठी बोलावलेली बैठक ही फक्त शिवसेनेची आहे का’, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.
नितेश राणेंच्या या सवालावर अनिल परब यांनी देखील राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही कोणाला निमंत्रण पाठवले नव्हते’, असं म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी नितेश राणेंना उत्तर दिलं आहे
“ही बैठक फक्त शिवसेनेची नव्हती, तर तिथे राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते. प्रशासनासोबत मंत्र्यांची चर्चा होती. या बैठकीसाठी आम्ही कोणाला निमंत्रण पाठवले नव्हते”, असं म्हणत अनिल परब यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं.
“या बैठकीत आम्ही कोकणातील कोरोना परस्थितीचा आढावा घेतला. चाकरमान्यांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देऊन त्यावर निर्णय घेऊ. चाकरमान्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेईल”, असं अनिल परब यांनी सांगितलं.