तुकाराम मुंढे यांच्या बदलीची मागणी आम्ही कधीच केली नव्हती. त्यांच्यासोबत मतभेद झाले, मात्र ते कामाच्या बाबतीत होते. वैयक्तिक मतभेद कधीच नव्हते. आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कार्य करावे, हीच आमची अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे.
तसे महापौरांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महापौर संदीप जोशी म्हणाले, “जनप्रतिनिधी याच शहरात लहानाचे मोठे झाले आहे. या शहराचा कानाकोपरा त्यांना माहिती आहे. नागरिकांच्या समस्या माहिती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून आयुक्तांनी प्रत्येक जनप्रतिनिधींशी समन्वय ठेवायलाच हवा. आम्हाला घेऊन चालावे”, अशी आमची अपेक्षा होती.
राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. त्यात नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सचिवपदी बदली झाली. तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. हे नागपूरचे नवीन महापालिका आयुक्त असतील.
‘आयुक्त तुकाराम मुंढे हे आमचे वैयक्तिक शत्रू नव्हते. त्यामुळे त्यांची बदली झाली असली तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचा आनंद नाही. लोकांना घेऊन चालले असते तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. ही बदली शासनाने केली आहे. आता शासन आमचं नाह.’ असेही ते म्हणाले.