नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आलेली असून दोन लाख २३ हजार ८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी ही तरतूद ९४ हजार कोटी इतकी होती. याशिवाय करोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. तसंच अजून दोन करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती देण्यात आलेली असून सामान्य करदात्यांना मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नसून टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर झाला आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प होता. तसंच पहिल्यांदाच पेपरलेस बजेट सादर करण्यात आलं असून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून ‘मेक इन इंडिया’ टॅबचा वापर करण्यात आला.