येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्यामध्ये होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र ५ ऑगस्टला मुख्य भूमिपूजनाच्या दिवशी मंचावर केवळ ५ जणांना स्थान देण्यात आलं आहे. या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह केवळ चौघा जणांना स्थान देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात अगदी काही लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यातही मुख्य मंचावर केवळ ५ व्यक्तींना स्थान मिळणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश आहे.
एकूणच कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय म्हणाले, भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आम्ही १३५ संतांना आमंत्रित केलं आहे. यात देशातील ३६ परंपरांच्या१३५ संताचा समावेश आहे.