मुंबई – राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करु शकतात. तत्पूर्वी काल झालेल्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत ‘आणीबाणी’चा मुद्दा चांगलाच गाजताना पाहायला मिळाला.
“राज्य सरकारने या अधिवेशनात दहा विधेयक दाखवली आहेत. त्यांना मूळात चर्चाच करायची नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा-ओबीसी समाजाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नये, यासाठी हे सरकार चर्चेपासून पळ काढतेय” असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि भाजप त्यांना देशद्रोही ठरवत आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षा भयंकर आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “इथल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या ? महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला, रशिया, अमेरिकेत काय झालं ते बोलता, महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात.” “तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन २५ ते ५० हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं. पण वास्तवात एक फुटकी कवडी सुद्धा दिली नाही” असे फडणवीस म्हणाले.