मुंबई : सावरगांव येथील दसरा मेळाव्यात सोशल डिस्टन्सचे कारण पुढे करून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्हयासह राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंकजाताई यांचेवरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान, गुन्हे दाखल करण्याचं सत्र आता माझ्यापर्यंत आलं आहे असं ट्विट पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे तर पंकजाताईंवरील गुन्हा हा तर सत्तेचा गैरवापर अन् राजकीय जळफळाट असल्याची प्रतिक्रिया खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
सावरगांव येथे पंकजा मुंडे यांचा ‘आपला दसरा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम ऑनलाइन होता. कोरोनाच्या संकटामुळे भगवान भक्तीगडावर गर्दी करू नये, आपापल्या गावांतच कार्यक्रम करून राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या चरणी नतमस्तक व्हावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तांना केले होते. असे असतांना देखील सोशल डिस्टन्सच्या कारणावरून पोलिस प्रशासनाने पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला, यामुळे कार्यकर्त्यांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
गुन्हे दाखल करण्याचे सत्र आता माझ्यापर्यंत
यासंदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या,
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले ,अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते ,परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाला, बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर अशा शब्दांत खेद व्यक्त केला.
हा तर सत्तेचा गैरवापर अन् राजकीय जळफळाट – खा.डॉ.प्रितमताई मुंडे
गोरगरीब ऊसतोड कामगार आणि राज्यातील कष्टकरी वंचितांचा ऊर्जास्थान असणारा मेळावा रोखण्याचे सर्व प्रयत्न विफल ठरल्यामुळे नैराश्य आलेल्या विरोधकांनी सत्तेचा गैरवापर करून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा केवळ राजकीय जळफळाट आहे असे खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी म्हटले आहे.
पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला दरवर्षी सारखाच यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला.मेळाव्याला प्रतिसाद मिळू नये म्हणून पाण्यात देव घातलेल्या लोकांची या मेळाव्याने पायाखालची वाळू सरकली आहे.कोरोना महामारीच्या संकटात देखील भक्ती आणि शक्तीची परंपरा ऑनलाइन मेळाव्याच्या माध्यमातून जोपासली गेली आणि पंकजाताईंचे म्हणणे लाखो लोकांपर्यंत पोहोचले. ऑनलाइन मेळाव्याच्या माध्यमातून ताईसाहेबांचे म्हणणे लाखो लोकांपर्यंत पोहोचले हीच विरोधकांची खरी पोटदुखी आहे. मेळावा रोखण्यास आलेल्या अपयशामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी म्हटले आहे.
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 26, 2020
Read Also