मुंबई : भाजप-शिवसेनेने 2019 च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या मात्र, मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहिला मिळाल्यावर त्यांची युती तुटली. हे दोन्ही पक्ष भविष्यात पुन्हा एकत्र येणार का ? अशा चर्चा वारंवार होत असतात. आता या चर्चांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुर्नविराम देत, या चर्चेत आता काहीही अर्थ उरलेला नसल्याचे म्हटले आहे.
पंकजा मुंडे आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, युती तूटून राज्यात सरकार स्थापन होऊनही एक वर्ष उलटले आहे. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही.
बाळासाहेबांनाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनामध्ये आदराच्या भावना आहेत. स्मृतिस्थळ असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी मी आले. बाळासाहेब आम्हा मुंडे कुटुंबासाठी आदरणीय आहेत. मुंडेसाहेब आणि बाळासाहेब यांचे घरगुती संबंध होते.