मुंबई : राज्यातल्या करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला आहे. तसेच राज्यात इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन अशा गोष्टींची कमतरता जाणवत आहे. परिणामी रुग्णांचे हाल होत असतानाचे विदारक चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे.
यातच काल नालासोपारा येथे दोन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये एकूण १० करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, ऑक्सिजनच्या अभावी या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. यावरून आता भाजपने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या घटनेवरून, राज्य सरकारवर ट्विट करून टीका केली आहे.
या ट्विटमध्ये भातखळकर यांनी, ‘नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते, असा टोला लगावला आहे.
दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील एक व्हिडिओ ट्विट केला असून, यात त्यांनी नालासोपारामधील करोना रुग्णांच्या मृत्यूला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
“मुंबईच्या जवळ असलेल्या नालासोपारा येथील विनायक हॉस्पीटलमध्ये सोमवारी एकाच दिवशी ७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. पण हे मृत्यू हॉस्पीटलमधील ऑक्सिजन यंत्रणेतील त्रृटीमुळे झाले आहेत. त्यामुळे हे मृत्यू नसून ठाकरे सरकारनं केलेली हत्या आहे. याला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
दरम्यान, नालासोपाऱ्यात खासगी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी १० रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्याबाबतीत वसई-विरार शहर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून सोमवारी मध्यरात्री आयुक्त कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी प्रेसनोट जारी करून स्पष्टीकरण दिले आहे. दुसरीकडे विनायक हॉस्पीटलमधील मृत्यू हे ऑक्सिनजच्या तुटवड्यामुळे झाल्याचे वृत्त पालघर पोलिसांनी फेटाळून लावले आहे. संबंधित रुग्णांचा मृत्यू त्यांचं वय अधिक असल्यानं आणि त्यांना सहव्याधी असल्यानं त्यात करोनाची लागण झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
7 #COVID19 Patients died today at Vinayak Hospital Nalasopara near Mumbai due to defect in #oxygen Supply. Thackeray Sarkar is responsible for these Death. Health Minister Rajesh Tope must resign immidately: @BJP4India @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/z4O36HY3GQ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 12, 2021