वडगाव मावळ : पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत आमदार सुनील शेळके मावळातील शेतकऱ्यांबरोबर आहेत की उपमुख्यमंत्र्यांबरोबर आहेत, असा थेट सवाल भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी उपस्थित केला आहे. पवना बंदिस्त जलवाहिनीवरून चर्चा सुरू झाली असताना भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे आमदार शेळके यांच्यावर निशाणा साधला आहे.
तिकिटाच्या खेळासाठी कुणामध्ये बदल झाला, याची मावळ तालुक्यातील जनतेला पुर्ण कल्पना आहे, अशी टीका भाजपने केला आहे.
पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात 2011 ला झालेल्या आंदोलनात मावळचे विद्यमान आमदार जलवाहिनी विरोधी कार्यकर्ते होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत होते व अजित पवार उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीची सत्ता आहे आणि अजित पवार हेच उपमुख्यमंत्री आहेत. विद्यमान आमदारांना खरोखरच मावळच्या शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द केल्याचा शासन आदेश आणून त्यांना निवडून दिलेल्या मावळच्या जनतेला दाखवावा. मावळ तालुकातील नागरिक त्यांचे जाहीरपणे स्वागत करतील व मावळ भाजप त्यांचा जाहीरपणे सत्कार करतील, असे आवाहन भाजपने केले आहे.
मावळ तालुक्यातील भारतीय किसान संघ, भाजपा, काँग्रेस (आय), शिवसेना, रिपाइं या पक्षांसोबतच तालुक्यातील जनतेचाही पवना बंदिस्त जलवाहिनीला कडाडून विरोध आहे, असेही भेगडे म्हणाले.