अनुसूचित जाती आणि जमातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकित देण्यात येणारे राजकीय आरक्षण रद्द करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भोपाळच्या दौऱ्यावर गेले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. व्होट बँकेचे राजकारण आणि सत्ता जाण्याच्या भीतीने हे आरक्षण रद्द करण्याची कोणत्याच राजकीय पक्षात धमक नसल्याची टीका हि त्यांनी केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, अनुसूचित जाती आणि जमातीला केवळ दहा वर्षांसाठीच आरक्षण देण्यात आले होते. तशी संविधानात तरतूद आहे, याकडे पत्रकारांनी आंबेडकरांचं लक्ष वेधले असता संविधानाबाबतचे तुमचे हे अज्ञान आहे. संविधानात दहा वर्षांच्या आरक्षणाची जी तरतूद आहे, ती केवळ राजकीय आरक्षणाबाबतची आहे. इतर आरक्षणाबाबतची नाही, असेही ते म्हणाले.
लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातीला राजकीय प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून हे आरक्षण ठेवण्यात आले. मात्र, त्यानंतर १९५४ मध्ये स्वत: बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणाची तरतूद काढून टाकण्याची मागणी केली होती.