नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात करोनाचे २ लाख ७३ हजार ८१० नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले असताना, दुसरीकडे मात्र अशा परिस्थितीमध्ये निवडणुक आयोग, निवडणूका कशा लावू शकतो आणि त्याही पुढे जाऊन सर्वपक्षीय राजकीय नेते जंगी सभा कशा घेऊ शकतात, असा सवाल देशातल्या सर्वसामान्य जनतेकडून केला जात आहे.
देशात सध्या ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशात निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्यातच निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्येच करोनाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत आहे. मात्र देशात परिस्थिती बिकट असूनही या ठिकाणी सर्वच राजकीय पक्ष सभा घेत असल्याने, त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी महत्त्वाचा निर्णय घेत, बंगालमध्ये आपल्या पुढील सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली असून, मी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प.बंगालमधील माझ्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, अशा रॅलींनी जनता व देशाला किती धोका आहे, याचा राजकीय पक्षांनी देखील विचार करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
दरम्यान, प.बंगालमध्ये ५ टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असू, आणखी ३ टप्प्यांसाठीचं मतदान बाकी आहे. दरम्यान, करोना साथीच्या वाढत्या संक्रमणामुळे निवडणूक आयोगाने देखील काही निर्बंध आणले आहेत. त्यानुसार निवडणुकीचा प्रचार रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याऐवजी संध्याकाळी ७ वाजताच बंद करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
In view of the Covid situation, I am suspending all my public rallies in West Bengal.
I would advise all political leaders to think deeply about the consequences of holding large public rallies under the current circumstances.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 18, 2021