पालघर: शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर संजय राऊत यांनी बोललं पाहिजे. त्यांनी शरद पवारांच्या पे रोलवर राहून बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील हे पालघर दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना म्हणाले शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक आहे. त्यावर बोललं पाहिजे. पवारांच्या पे रोलवर राहून पवारांची बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडल्या पाहिजे. आम्हाला हिंदुत्व पाहिजे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही आहोत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला तोच संदेश दिला आहे. पूर्वीच्या युतीत आम्ही समाधानी होतो. आताची युती नैसर्गिक नाही, अशा शिवसैनिकांच्या भावना आहेत. त्या राऊतांनी मांडल्या पाहिजेत, असा सल्ला पाटील यांनी दिला.
देशात काय चाललंय कळत नाही
पवारांच्या घरी दिल्लीत आज विरोधी पक्षांची बैठक आहे. त्यावरही त्यांनी टीका केली. काँग्रेस, पवार कोण काय कधी करेल सांगता येत नाही. कोण कुणाला भेटतंय ते कळत नाही. देशाच्या राजकारणात काय चालंलय ते समजण्याच्या पलिकडे आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
सरनाईकांनी पत्र का लिहिलं, राऊतांनी ‘कारण’ सांगितलं!
सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. एका केसमध्ये जामीन मिळाला की तत्काळ दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवले जात आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या संपूर्ण पत्रातील ‘विनाकारण त्रास’ हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
सरनाईकांच्या पत्राने ‘राजकारणाची नवी चाहूल’ असं ज्यांना वाटतं ते राजकारणातील कच्चे लिंबू
केंद्रीय तपास यंत्रणांचा विनाकारण त्रास होत आहे. त्रास टाळायचा असेल तर भाजपशी किंवा थेट मोदींशी जुळवून घ्या, अशा आशयाचे एक पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले आहे. सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात इतर बरेच विषय मांडले आहेत. ते त्यांचे वैयक्तिक मत असेल. एका आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले यावर प्रतिक्रिया द्यावी असे खास काहीच नाही, पण या पत्रामुळे महाराष्ट्रात राजकीय परिवर्तनाची नवी चाहूल लागली असे काहींना वाटत आहे. ते सर्व लोक राजकारणातील कच्चे लिंबूच म्हणायला हवेत, असा टोला राऊतांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.