लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोसळलेल्या दुधाच्या दरांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक शेतकरी संघटनांनी दूध दरवाढीसाठी तीव्र आंदोलन छेडलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील कोल्हापूरमध्ये शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन केंद्र सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडं घातलं
तसेच अमृतासारखं दूध जमिनीवर ओतून देताना होणारा त्रास समजून घ्या. 30 ते 35 रुपये उत्पादन खर्च असणाऱ्या दुधाला पाण्यापेक्षाही कमी किंमत मिळत आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच मरण येणारच असेल, तर सोशल डिस्टन्स कशाला? असा सवालही त्यांनी केला.
राजू शेट्टी म्हणाले, “शेतकऱ्यांना प्रतिलीटर दुधाला 30 ते 35 रुपये उत्पादन खर्च येतो. आज पिण्याच्या पाण्यालाही प्रतिलीटर 20 रुपये मिळतात. मात्र, दुधाला 17-18 रुपये दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. त्यामुळे अमृतासारखं दूध जमिनीवर ओतून देताना होणारा त्रास लक्षात घ्या. कर्जबाजारी होऊन मरण येणार असेल, तर सोशल डिस्टन्सिंग कशाला?”
“पाण्यापेक्षा या अमृताला कमी भाव दिला जातोय. आमच्या आया-बहिणी राबराब राबतात. शेणामुतात हात घालून काम करतात. त्या माऊलींच्या भावनांची किंमत नाही का? बाटलीबंद पाण्याला 20 रुपये आणि दुधाला 17 रुपये दर मिळतोय. मग आंदोलकांनी दूध ओतलं तर त्याला नासाडी का म्हणायचं? हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवशी पवित्र मनाने आंदोलन हाती घेतोय. शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही आशा आहे,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.