मुंबई : अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिरावरील आक्रमण ही लढाई फक्त मंदिर-मशिदीची नव्हती. संस्कृतीवर करण्यात आलेल्या आक्रमणाचीही होती, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप नेते माधव भंडारी यांच्या ‘अयोध्या’ या पुस्तकाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, खरंतर रामजन्मभूमीचं आंदोलन गेले अनेक शतकं सुरु होतं. 1528 साली बाबराचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येचं राम मंदिर तोडून मशिद बांधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सातत्याने हे आंदोलन सुरु राहिलं. ज्या लोकांना वाटतं हा केवळ मंदिर आणि मशिदीचा वाद आहे, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, अयोध्या भूमी कमी होती का? मशिद बांधण्यासाठी दुसरी जागा नव्हती का?
केवळ राम मंदिराला लक्ष्य केले गेले. कारण एखाद्या समाजाला पराजित मानसिकतेत न्यायचं असेल तर त्या समाजाचा आत्मा मारावा लागतो ते मीर बांकीला माहित होते. त्यामुळे संस्कृतीवर एक प्रकारचा घाला घातला गेला, असेही यावेळी फडणवीस म्हणाले.
भारताच्या हिंदू संस्कृतीने सर्वांना सामावून घेतले. आक्रमक करणाऱ्या, आश्रयीतांना देखील सामावून घेतले. म्हणून अशाप्रकारचा समृद्ध संस्कृतीवर जो घाला घालण्यात आला होता, त्याविरोधात ही लढाई होती, असे ते म्हणाले.