कोल्हापूर : 2021 सालच्या जनगणने दरम्यान प्रत्येक जातीची गणना व्हावी, अशी मोठी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या संदर्भात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट देखील घेणार आहेत.
कोल्हापुरात बोलताना आठवले म्हणाले की, कोणत्या जातीचा किती टक्का आहे हे समजत नाही. त्यामुळे 2021 जनगणना जातनिहाय व्हावी. यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे.
यावेळी बोलताना मराठा आरक्षणाविषयी देखील आठवले यांनी भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयही मराठा समाजाचा विचार करेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी ‘मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावं’, असे म्हटले आहे.
समाजातून जातीव्यवस्था संपवा, मग आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत, अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.