मुंबई : दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या बच्चू कडू यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी रोखले. राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ताफा रोखत त्यांना पुढे जाण्यास मनाई केली. परंतु कडू यांनी हार न मानता काल भारतपूरमध्ये मुक्काम करत आज पलवलच्या दिशेने प्रवास सुरु केलेला आहे. त्याचबरोबर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्तानचा आहे की पाकिस्तानचा हे चेक करावं लागेल”, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली . यासंदर्भात टीव्ही-9 मराठीने वृत्त दिले आहे.
दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर टीका करताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलन म्हणजे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असे म्हटले होते. जालन्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्यांच्या या टीकेला बच्चू कडू यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. दानवे यांचे हे वक्तव्य दुर्दैवी असून त्यांचा डीएनए चेक करावा लागेल, असं कडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपल्याला ते पाकिस्तानचे आहेत कि हिंदुस्थानचे हे समजेल अशी देखील टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या यान वक्तव्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने औरंगाबादमध्ये दानवे यांच्या घरासमोर बुधवारी आंदोलन करण्यात आलं. बच्चू कडू सध्या आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.