मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या करोना बाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं लसीकरणासाठी वयाची अट शिथिल करून १८ वर्षांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १८ वर्षांपासून वरील सर्व नागरिकांना लसींचा डोस टोचवून घेण्याची परवानगी मिळाली असून, मोहिमेचा या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी देशभरात १ मे पासून करण्याची शक्यता आहे. तसेच यातील ५०% लस ही केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत दिली जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारने देखील त्यांच्या कोट्यातून मोफत लस देण्याची व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
‘महाराष्ट्रात करोना बाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने आणि सद्यस्थितीतील लॉकडाऊन लावण्याच्या आधीसुद्धा, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दोन दोन आठवडे लॉकडाऊन लावण्यात आली असल्याने, लोकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लोकांचा मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडाला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना राज्य सरकारने आता तरी मदत करावी,’ असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.
तसेच, ‘पहिल्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारने कुठलंही आर्थिक पॅकेज अथवा मदत ही सर्वसामान्य दिली नाही. त्यामुळे ‘अकार्यक्षम सरकार’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने, करोना विरुद्धच्या लसीकरण कार्यक्रमात तरी आपली अकार्यक्षमता न दाखवता, १८ ते ४५ वयोगटातील सर्व नागरिकांना, आपल्या कोट्यातून मोफत लस द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.
राज्यातील18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना ठाकरे सरकारने त्यांच्या कोट्यातुन मोफत लस देण्याची व्यवस्था करावी अशी माझी मागणी आहे.
राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारकडे बोट न दाखवता थोडा भर स्वतः उचलायला हवा. pic.twitter.com/J94lgPXkQu— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 22, 2021