मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात एकीकडे दिल्ली सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा कहर. यावरून आता विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे.
ज राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ही वेळ आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱ्या भारतावर आली. गोरगरीब देश आपल्याला त्यांच्या ऐपतीने किडुकमिडुक मदत करीत असले, तरी आपले सन्माननीय पंतप्रधान महोदय २० हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्प थांबवायला तयार नाहीत. दिल्लीत नवे संसद भवन, त्यात पंतप्रधानांचा नवाकोरा महाल या योजनांवर हजारो कोटी रुपये उधळायचे व त्याच देशाने बांगलादेश, भूतान, श्रीलंकासारख्या देशांकडून करोना निवारणासाठी मदत स्वीकारायची, याची खंत कोणाला वाटू नये याचे आश्चर्य वाटते, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ सुरू असताना तिसऱ्या लाटेची धडक यापेक्षा जोरात बसेल, असे तज्ञ सांगतात, पण भाजपाचे लोक आजही प. बंगालात ममता बॅनर्जी यांची राजकीय कोंडी करण्याचा नाद सोडायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालय करोनाप्रकरणी रोज केंद्र सरकारला चाबकाने फोडून काढत आहे, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्याची सुत्रे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे द्यावीत अशी मागणी केली होती. यावर देखील सामनातून भाष्य करण्यात आले आहे.
सर्वत्र भीती व गोंधळाचे वातावरण आहे. सरकारचे डोके चालायचे एकतर बंद झाले आहे किंवा सरकारने संकटसमयी शस्त्र टाकून दिली आहेत. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोग्य मंत्रालयाची सूत्रे नितीन गडकरी यांच्यासारख्या धावपळ करणाऱ्या कार्यक्षम मंत्र्याकडे देण्याचे सुचवले. त्या मागची तळमळ समजून घ्या. देशाचे आरोग्यखाते सपशेल अपयशी ठरल्याचाच हा पुरावा आहे, असे म्हणत सामनातून एकप्रकारे गडकरींना पाठिंबाच देण्यात आला आहे.