2 दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राममंदिराच्या भूमिपूजनाचा भव्य असा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमावरून देखील राजकारण झाले. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. याशिवाय आमच्यासाठी बाबरी मशीद होती, आहे आणि राहील असे देखील म्हटले होते. आता शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून ओवेसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
अयोध्येत भव्यदिव्य राममंदिर उभारणीच्या कार्यास प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी रामदर्शन घेतले व साष्टांग असे दंडवत घातले. संकटाच्या चक्रव्यूहातून रामजन्मभूमी मुक्त झाली असे पंतप्रधान म्हणाले. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी अयोध्येतील सोहळ्याचे स्वागत केले आहे, पण काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही. अर्थात यात नेहमीप्रमाणे असदुद्दीन ओवेसी हेच आघाडीवर आहेत, असे म्हणत शिवसेने ओवेसींवर निशाणा साधला आहे.
सामना संपादकीयमध्ये म्हटले की, मोगलांच्या आक्रमणात हिंदूंचे स्वामित्व काही काळ लयास गेले, पण म्हणून त्यांचे अस्तित्वच संपले असे होत नाही. बाबराने रामजन्मभूमीचा विध्वंस केला व तेथे मशीद उभारली हे ओवेसींसारखे नेते का स्वीकारीत नाहीत? ओवेसी हे कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी आणखी एका मुद्द्यावर बांग दिली आहे. ते म्हणतात, ‘‘हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे राममंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहून मोदींनी संवैधानिक शपथ मोडली आहे. आजचा दिवस म्हणजे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची हार असून हिंदुत्वाचा विजय आहे!’’ ओवेसी यांच्या बोलण्यात तथ्य नाही.
बाबर जिंदा है। जिंदा रहेगा।’’ ओवेसी यांनी ही जी बांग दिली ते त्यांचे ‘स्वगत’ आहे. या स्वगताचे देशातील मुसलमान बांधवांनी स्वागत केले नाही. ओवेसी म्हणतात, ”बाबर जिवंत आहे.” आम्ही विचारतो, ”कोण हा बाबर? हा बाबर तुमचा कोण लागतो?’ बाबर या देशात दोन वेळा मेला. 450 वर्षांपूर्वी एकदा मेला. दुसऱ्य़ांदा मेला तो 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत रामभक्तांनी बाबरीचे घुमट तोडून उद्ध्वस्त केले तेव्हा., असे म्हणत शिवसेनेने ओवेसी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.