मुंबई : देशात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. दररोज शेकडो लोकांना या व्हायरसमुळे आपले प्राण गमवावे लागत आहे. तर अनेकांना आपले जवळचे नातेवाईक गमवावे लागत आहे. आरोग्य यंत्रणा अक्षरशा कोलमडून पडली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून यावर भाष्य करत केंद्र सरकारला जोरदार फटकारण्यात आले आहे.
मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मते मागितली, पण आता देशाचे स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत आहेत! अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? असाच प्रश्न देशाची सध्याची भयावह स्थिती पाहिल्यावर पडतो, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून मोठमोठ्या प्रचारसभा घेण्यात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दौरे केले होते. यावरून देखील सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. बंगालातील राजकीय पुढाऱ्यांचे, पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे लाखोंचे रोड शो आणि हरिद्वारमधील धार्मिक मेळे यांची दखल सर्वोच्च न्यायालयाने योग्यवेळी घेतली असती तर लोकांना असे रस्त्यावर तडफडून मरण्याची वेळ आली नसती, अशी टिप्पणी अग्रलेखातून करण्यात आली आहे.
देशात सध्या जो हाहाकार माजला आहे त्याचे खापर राज्यांवर फोडण्याऐवजी केंद्र सरकारच्या धुरिणांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. देशातील आरोग्य यंत्रणेने कोविड 19 च्या संकटाला पराभूत केल्याचा खोटा आभास निर्माण केला, पण दुसरी लाट येणार व ती भयंकर असणार याची सूचना असतानाही केंद्र सरकारने आरोग्य सुविधांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी काय केले?, असा सवाल देखील अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.