मुंबई : यूपीएचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडे जाणार अशा चर्चा मागील काही दिवसांपासून सातत्याने होत आहे. शिवसेनेकडून देखील शरद पवार यूपीएचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी केली जात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे कोठे तरी कमी पडतायत, असा टोला देखील सामना अग्रलेखातून लगावण्यात आला होता. याला उत्तर देताना काँग्रेसच्या अंतर्गत गोष्टींमध्ये पडू नये, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला सल्ले देण्यात आले आहे.
स्वातंत्र्य लढ्यात, स्वातंत्र्यानंतर देश घडविण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता. काँग्रेस हा एक विचार होता व काँग्रेससाठी लोक लाठ्या खायलाही तयार होते. आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. राज्यातील प्रादेशिक पक्षांनीही स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल. या विषयात इतरांनी पडू नये, असे काँग्रेस नेतृत्वास वाटते. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आमचेही त्याबाबत वेगळे मत नाही. मोठ्या पक्षाच्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा!, असे म्हणत सामना अग्रलेखातून काँग्रेसला लक्ष्य करण्यात आले आहे.
पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरू झाले आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपासमोर आव्हान उभे करावे, हा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष हे सर्व घडवून आणण्यास समर्थ असेल तर त्यांचे स्वागत आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
आघाडीतील सर्वात मोठय़ा पक्षाकडेच आघाडीचे नेतृत्व असते, असे काँग्रेसचे नेते हरीश रावत म्हणतात. ते योग्य तेच बोलले आहेत, पण या मोठय़ा पक्षाने जमिनीवर चालू नये. मोठी झेप घ्यावी, अशी सगळय़ांची अपेक्षा आहे. काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की काय आकारमानाचा? काँग्रेसच्या खालोखाल तृणमूल, अण्णा द्रमुक असे पक्ष संसदेत आहेत व हे सर्व भाजप विरोधक आहेत. देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंडय़ाखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा?, असा खोचक सवाल शिवसेनेने विचारला आहे.
काँग्रेस मोठा पक्ष आहेच. स्वातंत्र्य लढय़ात, स्वातंत्र्यानंतर देश घडविण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे. काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता. काँग्रेस हा एक विचार होता व काँग्रेससाठी लोक लाठय़ा खायला तयार होते. आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.