पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कारगिल विजय दिनानिमित्ताने ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला होता. आता यावरून शिवसेनेने सामना अग्रलेखातून मोदींवर जोरदार टीका केली आहे.
मोदींनी आपल्या कार्यक्रमात पाकिस्तानचा उल्लेख केला होता. शिवसेने म्हटले आहे की, पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक वगैरे करूनही त्यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच. यावर पंतप्रधान मोदी यांनी असे लॉजिक मांडले की, ‘पाकिस्तान दुष्ट आहे. दुष्टांचा स्वभाव काही केल्या आपण बदलवू शकत नाही. दुष्ट स्वभावाची माणसे काही कारणाशिवाय कोणाशीही वैर घेतात. वैर घेणे हा त्यांचा स्वभावच असतो. हिंदुस्थानने पाकिस्तानबरोबर नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला. मात्र पाकिस्तानने हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसण्याचाच प्रयत्न केला.’ पंतप्रधान मोदी यांनी सत्य तेच सांगितले. पण हेच ‘मैत्रीचा हात’ प्रकरण चीनच्या बाबतीतही लागू पडते. दुष्टपणा त्यांच्या वाकड्या नजरेतही स्पष्ट दिसतो. पण ते वाकडे डोळे काढून त्यांच्या हातात देण्याचे शौर्य आता गाजवायला हवे. आजार बळावला आहे. तो टोकास जाण्याआधीच पंतप्रधानांनी शस्त्रक्रिया करावी हे बरे.
कारगिल विजय दिवसाबरोबर ‘गलवान’ व ‘पेंगाँग’ विजय दिवसही साजरा होऊ द्या! कारगिल विजय दिवसाचा हाच संदेश आहे,” असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
“सध्या आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने कोण पाहत आहे? वाकडय़ा नजरेने पाहणाऱ्यांना आपण सडेतोड उत्तर नक्की कधी देणार आहोत? पंतप्रधान मोदी यांनी तर त्यांच्या ‘मन की बात’मध्ये चीनचे नावही घेतले नाही. देशाची जनता मनकवडी आहे. त्यामुळे लोकांनीच काय ते समजून घ्यावे, असे पंतप्रधानांनी ठरवून टाकले आहे. गलवान खोऱ्यात आपले 20 जवान शहीद झाले. त्यांच्या हौतात्म्याचा बदला आपण घेतला नाही,असेही शिवसेनेने म्हटले आहे.