सांगली : देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. अनेक राज्यांमध्ये स्थिती गंभीर असून, परिस्थितीप्रमाणे त्या-त्या राज्यांमध्ये नवीन करोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली आहे. दुसरीकडे करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा राजुत १ मार्च पासून सुरु झाला असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेद्वारे लस टोचवून घेण्याचे आवाहन देशभरातील नेत्यांकडून केले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातही करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारचे धाबे दणाणले असून, शासन आणि प्रशासनाने त्या अनुषंगाने कठोर उपाययोजना करत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारने ५ एप्रिलपासून करोना प्रतिबंधक नवीन नियमावली जाहीर केली आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांना करोना लस टोचवून घेण्याचे आवाहन देखील सरकारकडून केले जात आहे.
यातच वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे, आज अजून एक वादग्रस्त विधान केले आहे. संभाजी भिडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, करोनाचा फैलाव वाढल असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मुळात करोना हा रोगच नाही आहे. करोना हा मानसिक आजार आहे. करोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत. करोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे, असे विधान केले आहे.
तसेच त्यांनी ‘लहरी राजा, प्रजा आंधळी’, असा करोनाबाबत राज्यात आणि देशात कारभार सुरू आहे. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, जो तो ती घेईल, सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने स्वच्छ कारभार करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही सरकारला दिला आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले नाही तरच नवल!
दुसरीकडे, करोनाच्या नव्या लाटेमुळे राज्यात आणि देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहेत. काल दिवसभरात राज्यात करोनाचे ५९ हजार ९०७ नवे रुग्ण सापडले असून, संपूर्ण देशात सापडणाऱ्या करोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या ही सव्वा लाखाच्या पुढे पोहोचली आहे.