मुंबई – स्वातंत्र्याचे हवन परकीयांकडूनच होते असे नाही. स्वातंत्र्यासाठी घामही न गाळणारे राज्यकर्ते म्हणून येतात तेव्हा ते स्वातंत्र्यावरच सगळ्यात निर्घृण हल्ला करतात. आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी 83 वर्षांचे रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्यांना भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला, दुसरे काय? असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
‘सध्या आपल्या देशात नक्की काय सुरू आहे ते ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे वर्षभर परदेशात गेले नाहीत. ते हिंदुस्थानातच आहेत, पण हिंदुस्थानातील जनतेचे किती प्रश्न या काळात सुटले? असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला आहे.
‘वर्षभरापूर्वी ट्रम्प हे अहमदाबादेत ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी अवतरले तेव्हा 50 लाख लोकांनी स्वागत केले. ट्रम्प व त्यांच्याभोवती असलेल्या अमेरिकन मंडळींनी कोरोनाचा प्रसार केला व निघून गेले. ते ट्रम्प आता सत्ता गमावून बसले आहेत. ट्रम्प यांनी सत्ता टिकविण्यासाठी झुंडशाहीचे शेवटचे टोक गाठले. आपल्या गुंड समर्थकांना त्यांनी अमेरिकेच्या संसदेत घुसवून हिंसाचार केला. त्यात संसदेतच गोळीबार झाला. अमेरिकेच्या इभ्रतीची आणि लोकशाहीची पुरती लक्तरे त्यात निघाली. अमेरिका असेल किंवा हिंदुस्थान, आता लोकशाही ही शोभेचा आणि पोकळ डोलारा म्हणूनच उभी आहे. निवडणूक निकाल फिरवावा म्हणून ट्रम्प यांनी गयावया केली. हिंदुस्थानी लोकशाही पद्धतीत अशी गयावया वगैरे करावी लागत नाही. विरोधात उभे राहणाऱ्य़ांना नष्ट केले की काम भागते आणि निवडणुकांचे निकाल ठरवून घेतले की झाले, लोकशाही या संस्थेवरील लोकांची श्रद्धा आता पूर्ण उडाली आहे’ असंही राऊत म्हणाले.
‘देशभक्तीची नवी लस सध्याच्या राज्यकर्त्यांनी लोकांना टोचली आहे. त्या लसीचा परिणाम असा की, सध्या आपल्या देशात प्रचाराचा, विकासाचा, विचाराचा मुद्दा म्हणजे देशभक्ती हाच बनला आहे. जणू काही ‘देशभक्ती’ या शब्दाचा उदय 2014 नंतर झाला. त्याआधी शतकानुशतके देशभक्ती कशाशी खातात हे हिंदुस्थानवासीयांना माहीत नव्हते. स्वातंत्र्य संग्रामात जे सहभागी झाले व मरण पावले तेसुद्धा सध्याच्या युगात देशभक्त नसावेत. पंतप्रधान मोदी व भाजपचा जयजयकार करीत आहेत तेच देशभक्त असे आता नक्की करण्यात आले आहे’ असा टोलाही राऊत यांनी लगावला.
‘पंजाबच्या सीमेवर शेतकरी थंडी-वाऱ्य़ात कुडकुडत उभा आहे. या आंदोलनात 57 शेतकरी मरण पावले. त्यांच्याविषयी संवेदनेचा एकही चकार शब्द न काढणाऱ्य़ांचे सरकार दिल्लीत आहे. असे माणुसकी नसलेले सरकार कोणत्या ‘शाही’त बसते? असा सवालही राऊत यांनी विचारला.
‘आज देश व राजकारण एका व्यक्तीभोवती फिरत आहे. लोकसभेचे तरी सार्वभौमत्व उरले आहे काय? लोकसभेच्या सार्वभौमत्वाची जागा पंतप्रधानांच्या सार्वभौमत्वाने घेतली आहे. गेल्या काही वर्षांत एकामागून एक घटनादुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या, पण दिल्लीच्या सीमेवर 45 दिवस मरत असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्य़ांसाठी कायद्यात दुरुस्ती करायला सरकार तयार नाही. कृषी कायदे मागे घ्या ही शेतकऱ्य़ांची प्रमुख मागणी असेलही, पण त्यावर लोकसभेत चर्चा तरी होऊ द्या! सध्या काय सुरू आहे त्याची तुलना आणीबाणीशीच करता येईल’ अशी टीकाही राऊत यांनी केली.
‘देशाचे भूषण ठरलेले सर्वच सार्वजनिक उपक्रम केंद्र सरकारने विकायला काढले आहेत व एखाद दुसऱ्य़ा उद्योगपतीलाच ते विकले जात आहेत. देशाची सार्वजनिक संपत्ती अशा प्रकारे खासगी भांडवलदारांची होत आहे व त्यावर बोलणारे देशाचे शत्रू ठरवले जात आहेत. वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर शंभरावर राजेरजवाड्यांची संस्थाने खालसा केली व देश एकसंध केला. इंदिरा गांधींनी या संस्थानिकांचे तनखेच बंद केले. आता देशात पुन्हा दोन-चार नवे संस्थानिक निर्माण केले जात आहेत’, असा आरोपही राऊत यांनी केला.
‘कोरोनाची लसनिर्मिती व त्यावर वैज्ञानिकांनी केलेले संशोधन हा फक्त मोदी यांचाच चमत्कार असा प्रचार सुरू झाला आहे. हा देशातील संशोधकांचा अपमान आहे. हजारो लोकांच्या सायबर फौजा सज्ज केल्या गेल्या आहेत. विरोधकांच्या बदनामी मोहिमा व सत्ताधाऱ्यांची टोकाची ‘जी हुजुरी’ त्याच माध्यमातून सुरू असते. वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांच्या मालकांवर, संपादकांवर अज्ञात दडपण आहे. व्यक्तिस्वातंत्र्य व निःपक्ष पत्रकारिता संपली आहे. हे जे सुरू आहे त्यास हिंदुस्थानची लोकशाही समजायचे काय? असा संतप्त सवालही राऊत यांनी विचारला.
‘अमेरिकेतील जनतेने झुंडशाही करणारा बादशहा व त्याच्या टोपीसही उडवले. जगातील लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी हा शुभशकुन आहे’ असंही राऊत म्हणाले.