परभणी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारले आहे. संजय राऊत एवढे थोडेच महत्त्वाचे आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलायचं?, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे. ते परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणीत त्यांनी आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा, मी कालच राऊतांबद्दल बोललो आहे. त्यांच्याबद्दल मी रोज रोज काय बोलावं. ते एवढे थोडीच महत्त्वाचे आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
परभणीतील कोरोना परिस्थिती बरी आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न सुरू केला आहे. ही समाधानकारक बाब आहे. तसेच रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्या खासगी रुग्णालयाचं ऑडिट केलं पाहिजे. त्याची माहिती सरकारने घेतली पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. राज्यातील कोरोना मृत्यूची संख्या दडवली जात आहे, असा आरोपही फडणवीसांनी यावेळी केला.
दरम्यान, फडणवीसांच्या वेदना मी समजू शकतो, माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली, असा त्यांना वाटतं म्हणून ते टीका करत आहेत, मात्र त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत आणि मित्र राहतील,’ अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली होती.