मुंबई: महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमतानं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच सेनेने स्वीकारावं, असं भास्कर जाधव म्हणालेत. तसेच तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असंही त्यांनी सांगितलंय. भास्कर जाधव गुहागरमध्ये बोलत होते. शिवसेनेकडे आधीच कोणतीही महत्त्वाची खाती नाहीत आणि त्यात आहे हे मंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.
कोणाला काय द्यावं, कोणाला कुठे बसवावं हे तिन्ही पक्षांनी मिळून ठरवायचं असतं. भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले तर चांगल्या प्रकारे काम करतील, असं मत तिन्ही पक्षांचं मत झालंय. शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मतावर मी ठाम आहे. शिवसेनेकडे वनखातं तसंच ठेवून जर अध्यक्षपद मिळत असेल तर घ्यावं. एक तर शिवसेनेकडे महत्त्वाची खातीच नाहीत. त्यामुळे शिवसेनेनं मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घ्यावं असं मला वाटत नाही, असंही भास्कर जाधवांनी स्पष्ट केलंय.
सुधीर मुनगंटीवार यांनी धमकी दिल्याचा आरोप
सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत असताना विरोधकांनी त्यांना मध्येमध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलत होते. आता आत जात आहेत, अशी धमकीच सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घातला. तर, विधानसभा अध्यक्षांनी हे वाक्य कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या.
भास्कर जाधव यांना सुरक्षा, गृह खात्याचा निर्णय
पावसाळी अधिवेशातील पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. इतकंच नाही तर अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला होता. त्यानंतर अखेर जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडीनं जाधव यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन भास्कर जाधव यांनी चांगलंच गाजवलं
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन भास्कर जाधव यांनी चांगलंच गाजवलं होतं. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, कोरोना, शेतकरी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवर भाजप नेते सरकारला धारेवर धरणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. सुरुवातीचा काही काळ तसं चित्रही पाहायला मिळालं होतं. मात्र भास्कर जाधव जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून बसले, त्यावेळी सभागृहातील चित्रच पालंटलं होतं. जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. सभागृहातील जाधव यांच्या पवित्र्यामुळे त्यांना सोशल मीडियातून धमक्या येत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत होता. त्यानंतर गृह खात्याने भास्कर जाधव यांना दोन सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा पुरवण्यात आली होती.