मुंबई : “शरद पवार साहेबांची बदनामी करण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकरांना विधानपरिषदेची आमदारकी देऊन केलेली एक चाल आहे. त्यामुळे पडळकरांकडे लक्ष देण्याची गरज नाही”, असं ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ म्हणाले. पडळकरांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, त्यांची विचारसरणीच वाईट आहे, असं उत्तर मुश्रीफांनी दिलं. आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’, गावागावात कोरोनाने कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, अशा परिस्थितीत कोरोनामुक्त गावांची स्पर्धा कशी भरवता, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी विचारला होता.
त्यावरुन हसन मुश्रीफांनी पडळकरांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं. तसंच शरद पवारांची बदनामी करण्यासाठी भाजपने पडळकरांना आमदारकी दिल्याचं मुश्रीफ म्हणाले. शरद पवारांमुळे आरक्षण मिळालं नाही या चंद्रकांत पाटलांच्या आरोपावर मुश्रीफांनी उत्तर दिलं, ते म्हणाले, “पवारसाहेब मुख्यमंत्री नाहीत आणि पंतप्रधानही नाहीत, त्यांच्यामुळे आरक्षण गेलं असं मूर्खपणाचं वक्तव्य भाजपचे लोक करत आहेत. शरद पवारांबद्दल बोलून स्वतःचं हस करून घेत आहेत, पवारांचा आणि आरक्षणाचा काही एक संबंध नाही”, असे त्यांनी म्हटले आहे.
आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आरक्षण दिलं. पण १०२ वी घटना दुरुस्ती झाली आणि राज्याचे अधिकार आरक्षण संदर्भात काढून घेतले. आम्ही जास्त वकील ठेवले. मात्र १०२ वी घटना दुरुस्ती झाली, त्यात शरद पवारांचा संबंध कुठून आला, असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी विचारला.