मुंबई – केंद्र सरकारने संसदेच्या सभागृहात मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करत शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले आहेत. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. उद्याच्या भारत बंदला सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, कृषी कायद्याविरोधात मनसेच्या नेत्यांनी विरोधात भूमिका घेतली आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्यासंदर्भातील विधेयकालाही विरोध होत आहे. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळेच शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं शरद पवार यांनी यापूर्वी म्हटल्याचं, मसनेचे नेते अनिल शिदोरे यांनी म्हटलंय.
शरद पवार यांनी कृषी वेधयकाला विरोध केल्यानंतर त्यांच्याच लोक माझे सांगाती पुस्तकातील आठवण त्यांना करुन देण्यात येत आहे. ”राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांनी त्यांच्या “लोक माझे सांगाती..” ह्या पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे कसा अन्याय होतो आहे आणि हे नियंत्रण काढलं पाहिजे असं म्हटलं असल्याचं समजलं. मी पुस्तक वाचलेलं नाही पण हे खरं आहे का?” असा सवाल अनिल शिदोरे यांनी विचारला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे शरद पवार यांनी राऊत यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, केंद्र सरकारने कृषी विधेयक अत्यंत घाईघाईने संसदेत संमत करून घेतली. त्यामुळेच सरकारला आता शेतकऱ्यांच्या उद्रेकाला तोंड द्यावे लागत आहे. सरकारने यावर चर्चा करावी, सर्वांशी बोलावे, एकत्र बसून निर्णय करावा, अशी मागणी केली होती. मात्र सरकारने ऐकले नाही.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार @PawarSpeaks ह्यांनी त्यांच्या "लोक माझे सांगाती.." ह्या पुस्तकात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणामुळे कसा अन्याय होतो आहे आणि हे नियंत्रण काढलं पाहिजे असं म्हटलं असल्याचं समजलं. मी पुस्तक वाचलेलं नाही पण हे खरं आहे का? @supriya_sule
— Anil Shidore (@anilshidore) December 6, 2020