मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलून टाकणाऱ्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसातील सभेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. शरद पवारांनी भर पावसात सभा तर गाजवलीच पण भाजपचे मैदानात उतरलेल्या पैलवानांना चांगलेच अस्मान दाखवले होते. विशेष म्हणजे, शरद पवारांनी सातारकरांना जे आवाहन केले होते, तेही खरे ठरले आहे.
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न आल्यामुळे 2019 ची विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादीसाठी अस्तित्व ठिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशीच होती. भाजपने एकीकडे मेगाभरती काढून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भलेमोठे खिंडार पाडले होते. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे हे भाजपात दाखल झाले होते.
विशेष म्हणजे, उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा हादरा होता. राष्ट्रवादीचे अर्ध्याहून अधिक नेते भाजपात दाखल झाल्यामुळे भाजपचा रथ चौफेर उधळला होता. पण, शरद पवार हे इतक्यात पराभव स्वीकारणे नव्हते.
साताऱ्यात 18 ऑक्टोबर 2019 रोजी शरद पवारांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभा आयोजित केली होती. आधीच पावसाचे ढग जमा झाले होते. त्यामुळे सभेवर पावसाचे संकट होते. पण या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सभेदरम्यान पावसाची भूरभूर सुरू झाली होती शरद पवार भाषणासाठी उभे राहिले तेव्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पण, शरद पवारांनी भाषण थांबवले नाही. पावसात भिजत पवारांनी खणखणीत भाषण केले.
‘लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातील उमेदवार निवडण्यात मी चूक केली. आता ही चूक आपल्याला दुरुस्त करायची आहे. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणूक तुम्ही मोठ्या मताधिक्याने श्रीनिवास पाटील यांना निवडून द्या,’ असं म्हणत शरद पवार यांनी उदयनराजेंवर टीकास्त्र सोडले होते.
निवडणुकीच्या मैदानात बॅकफुटवर गेलेल्या राष्ट्रवादीने या सभेमुळे जोरदार कमबॅक केले. राष्ट्रवादीला कमी जागा येतील असा अंदाज असताना अपेक्षित यश मिळाले. विशेष म्हणजे, सत्तेचं स्वप्न न पाहणाऱ्या राष्ट्रवादीने पुढे शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही ही सभा पक्षासाठी मैलाचा दगड ठरली, असं सांगत सोशल मीडियावर 18 ऑक्टोबर सभापूर्तीचा जल्लोष साजरा करत आहे.
शरद पवार यांनी केले हे आवाहन साताऱ्यातील तमाम जनतेनं मनावर घेतले आणि दुसऱ्यांदा खासदारकीची निवडणूक लढवणारे उदयनराजे भोसले पराभूत झाले. ज्या साताऱ्यात राष्ट्रवादीच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आलो होतो, त्याच राष्ट्रवादी पक्षाचे श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंना पराभव केला होता.
उदयनराजे यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. एव्हाना भाजपाला ही मोठा धक्का होता. कारण, भाजपने उदयनराजेंच्या विजयासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी सभा घेतल्या होत्या. पण, सातारकरांनी शरद पवारांना साथ दिली.
Read Also :
भाजप सत्तेत असताना मदरसे बंद केले नाही? खासदार इम्तियाज जलीलांचा भाजपला सवाल https://t.co/gZLWSG3h80 @imtiaz_jaleel
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 18, 2020