कोल्हापूर : कोल्हापुरात महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका आधी कोणी घेतली, यावरुन काँग्रेस नेते सतेज पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात वाकयुद्ध रंगलं. शिवसेनेने स्वबळाची भाषा आधी केल्याचा दावा सतेज पाटल्यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये ठिणगी उडाली.
स्वबळाची भाषा सर्वात आधी राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना मेळाव्यात केल्याचा दावा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. क्षीरसागर यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. सतेज पाटील शिवसेना आणि राष्ट्रवादीला टेकओव्हर करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला.
सतेज पाटील भाषणात काय म्हणाले?
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सगळेच पक्ष वेगवेगळे लढण्याची भाषा करत आहेत. पदवीधर-शिक्षक मतदारसंघात आपण एकत्र निवडणुका लढवल्या. जिथे शक्य तिथे महाविकास आघाडी करण्याची गरज आहेच. परंतु विशिष्ट परिस्थितीत तसं करता येणार नाही.
मी, हसन मुश्रीफ वगैरे वरिष्ठांशी बोलूच. तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एकत्र निवडणूक लढवल्यास आमच्यातीलच एक-एक बाजूला जायला वेळ लागणार नाही. असं सतेज पाटील म्हणाले.
मी लहान भाऊ आहे, मला सगळ्यांना घेऊन जावं लागतं
पाच-दहा वॉर्डात आघाडी शक्य असेल तर बघू, पण संजयदादा म्हणतात… परस्पर जाहीर करु नका, आता तुम्ही बोलल्याने मलाही बोलणं भाग पडतंय, की शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी सुरुवात केली. त्यांचा मेळावा पहिला झाला, मग मुश्रीफ साहेब बोलले, आणि मी सगळ्यात शेवटी… मी लहान भाऊ आहे, मला सगळ्यांना घेऊन जावं लागतं. जिल्हा परिषद असो किंवा गोकुळ… सगळ्यांची मोट बांधावी लागते.” असं सतेज पाटील म्हणत होते.
मी काँग्रेस, कसा तुमच्या मागे फरपटत येतो?
“तुम्ही पेपरची वक्तव्यं काढून बघा, मी स्वबळाबाबत पहिलं वक्तव्य केलेलं नाही. शिवसेनेच्या आंबेवाडीच्या मेळाव्यात माजी आमदार राजेश क्षीरसागर बोलले की आम्ही सर्व जागा लढवू, मग मुश्रीफ साहेब बोलले, मग शिवसेना-राष्ट्रवादी बोलल्यावर मी काँग्रेस, कसा तुमच्या मागे फरपटत येतो?
विनोदाचा भाग सोडा… आपण सत्ता आणण्यात एकत्रित आहोत. जेव्हा राज्यात सरकार नव्हतं, तेव्हाही काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित आली होती.” अशी पाच वर्षांपूर्वीची आठवण बंटी पाटलांनी सांगितली.
राजेश क्षीरसागर यांचे उत्तर काय?
पालकमंत्री बंटी पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेसंदर्भात कसबा-बावडा इथे फिक्सिंग भाषणाचा मेळावा घेतला. या भाषणात कोल्हापूर महापालिकेत शिवसेना वेगळी लढेल, असं मी (राजेश क्षीरसागर) पहिल्यांदाच म्हटल्याचा आरोप केला. माझं त्यांना जाहीर आवाहन आहे, की आपल्याकडे मोठी यंत्रणा आहे, गेल्या काही महिन्यातील वर्तमानपत्रं काढून पाहावीत. वेगळं लढूया असं पहिल्यांदा कोण म्हणालं, हे तुम्हाला दिसून येईल.
तर इथे राष्ट्रवादीने पहिल्यांदा स्वतंत्र लढण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेस म्हणाली. मग शिवसेनेसारख्या स्वाभिमानी पक्षात असताना आम्ही कुठे कमी आहोत. आम्ही तिथे संपूर्ण जागा लढू शकतो, या दृष्टीने मी वक्तव्य केलं. असा दावा राजेश क्षीरसागर यांनी केला.
राष्ट्रवादीलाही राजकीय टेकओव्हर करण्याचं काम
शिवसेना हा शहरात कमजोर आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. शिवसेनाच काय, राष्ट्रवादीलाही राजकीय टेकओव्हर करण्याचं काम बंटी पाटील करत आहेत. स्वतःला काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत, राज्यात मात्र योग्य तो वाटा घ्यायचा. तिथे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, हे त्यांना दिसत नाही. शहरात काही द्यायची वेळ येऊ नये, म्हणून जास्तीत जास्त जागा उभ्या करायच्या, हाच यामागचा हेतू आहे, असा घणाघातही क्षीरसागरांनी केला.
मला बोलावं लागेल… की त्यांना जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत, म्हणूनच त्यांनी महाविकास आघाडी केली नाही. वरिष्ठांचं आम्ही आजही ऐकायला तयार आहोत, महाविकास आघाडी करायला तयार आहोत, असं राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेचं बोट धरुन सतेज पाटील विधानसभेत
2014 मध्ये सतेज पाटील यांचा पराभव झाला. 2017 मध्ये त्यांची विधानपरिषदेवर नेमणूक झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांनी बंटी पाटलांना मतदान केलं. 2019 च्या विधानसभेला त्यांनी धोका दिला. जेव्हा लागतं, तेव्हा निश्चितपणे शिवसेनेकडून घेतात. बंटी पाटील विधानसभेची पायरी चढण्याची पहिली वेळ होती, तेव्हा शिवसेनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. शिवसेनेचं बोट धरुन ते विधानसभेत पोहोचले. ते आज विसरले आहेत, अशी खंत क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
…अन्यथा 2014 सारख्या परिस्थितीला वेळ लागणार नाही
2014 मध्ये ते काही नव्हते, आज ते पालकमंत्री आहेत, पुतणे आमदार आहेत, राजकीय परिस्थिती आहे तशी राहत नाही. राष्ट्रवादीतही खळबळ उडाली आहे. त्यांचे नेते सतर्क झाले आहेत. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून आपण निर्णय घेतले पाहिजेत. 2019 ला आम्हाला धोका दिला, कारण आम्ही बेसावध होतो. पण शिवसेना कशी कोणाला मदत करते, हे जनता आज उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
पुढच्या काळात त्यांनी काम सुधारावं, झालं गेलं जाऊ द्या, अन्यथा राजकीय चक्र वर-खाली सुरुच राहतं, त्यामुळे खाली यायला वेळ लागणार नाही आणि कोणावर आरोप करु नयेत. माझ्यावर काहीही खापर फोडू नका. अन्यथा 2014 सारखी वेळ यायला वेळ लागणार नाही, असा इशाराही राजेश क्षीरसागर यांनी दिला.
Read Also :
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला…
“छगन भुजबळ आणि वडेट्टीवारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”
“संजय राऊत यांच्या कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा”; किरीट सोमय्या यांची मागणी
खासदाराच्या उपस्थितीच शिवसैनिकाची पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण