मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. त्यात एका मुलाने गावात पाणी नसून आमदार गिरीश महाजन माझा फोन उचलत नाहीत, अशी तक्रार केली होती. यावर खडसेंनी, “तो फक्त मुलींचेच फोन उचलतो”, असं विधान केलं होतं.
यावर भाजप नेते गिरीश महाजनांनी देखील पलटवार करत, “मी त्यासाठी एकनाथ खडसेंना दोष देणार नाही. कारण वाढतं वय, इतके आजार आणि त्यात जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं झालंय असं मला वाटतंय”, अशी टीका केली होती.
दरम्यान, आता पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर, शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यातल्या लसीकरणावरून निशाणा साधला आहे. “गिरीश भाऊंना माझा सल्ला आहे. पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांनी गिरीशभाऊंना वर स्टेजवर बोलावलं होतं. जर त्याचा काही प्रभाव पडला असेल, तर जास्तीत जास्त लस जळगावसाठी आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी आणावी. गिरीशभाऊंनी आवश्यक तो लसीचा साठा महाराष्ट्रासाठी मिळवून दिला, तर त्यांचा मी भर चौकामध्ये सत्कार करीन”, असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांना दिलं आहे.
तसेच, “राज्य सरकार पूर्ण लसी घ्यायला तयार असेल, तर लस देण्याचा अधिकार कुणाला आहे, हे माझ्यापेक्षा गिरीशभाऊंना चांगलं माहिती आहे. राजकारण कोण करतंय हे गिरीश भाऊंना माहिती आहे. राज्याला लसी पूर्ण उपलब्ध झाल्या, तर महाराष्ट्र सरकारची आरोग्य यंत्रणा एवढी सज्ज आहे की दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण राज्याचे लसीकरण केले जाऊ शकते. पण लसीकरणाचा कोटाच जर आला नाही, तर इथे परमेश्वर जरी आला, तरी लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही”, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.