सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही, पण प्रश्न आहे मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा व त्यांच्यावर सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीचा. कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने कोणी करणार असतील तर त्यांना रोखावेच लागेल. सुशांतला न्याय मिळो, नव्हे न्याय मिळायलाच पाहिजे. मात्र मुंबई पोलीस सत्य व न्यायाच्या मार्गावर असतानाच त्यांना रोखले हे बरोबर नाही, अशा शब्दात तीव्र शब्दात सामनामधून शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हटलंय नेमकं सामनामध्ये
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील, दिल्लीतील व बिहारसारख्या राज्यांतील काही मंडळींना अत्यानंदाचे भरतेच आले आहे.
बिहार विधानसभेची निवडणूकच जिंकली अशा पद्धतीने ‘न्याय, सत्य’ चा धोशा लावून नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशाला राज्यघटना आणि संघराज्य देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयला यापद्धतीने घुसवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केलेल्या संघराज्यावरचे आक्रमण आणि त्यांनी आखून दिलेली चौकट मोडण्याचाच प्रकार आहे.
मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा शंभर नंबरीच आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसांनी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही.
बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी न्यायालयाच्या निकालानंतर ”ये न्याय की अन्याय पर जीत है,” अशी प्रतिक्रिया दिली होती. याचा देखील समाचार सामनामधून घेण्यात आला आहे. पांडे हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी हाती भाजपचा झेंडा पकडून पत्रकारांशी बोलणेच काय ते बाकी होते अशा खोचक शब्दात सामनामधून पांडे यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
मुझफ्फरपूरचे नवरुणा हत्याकांड, सिवानमधील पत्रकार राजदेव रंजन हत्या प्रकरण अशा अनेक बिहारमधील गुन्हांचा दाखल देत अशी प्रकरणे सीबीआयकडे सोपवण्यात आली यापैकी कोणाचेही गुन्हेगार पकडले गेले नाहीत. त्यांच्या कुटुंबांवर जो अन्याय झाला त्यावर न्याय व सत्य यांनी विजय मिळविला नाही असे देखील सामनातून नमूद करण्यात आले आहे.