मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला सणसणीत टोला लगावण्यात आला आहे. “एका वर्षात दोनदा सुतक लागणं हे हिंदू शास्त्रानुसार चांगलं नाही” असं अग्रलेखात म्हटलं आहे.
“महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱ्यांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे. वर्षभरापूर्वी 105 आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
तसेच “चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही एकटे लढलो म्हणून हरलो. ते खरे आहे, पण आम्ही सर्वशक्तिमान आहोत व एकटेच लढणार व जिंकणार ही खुमखुमी त्यांचीच होती. ती चांगलीच जिरली आहे” असं म्हणत भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.