मुंबई : देशभरात करोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असताना, दुसरीकडे त्यावरून राजकारण तापताना दिसत आहे. महाराष्ट्रातदेखील रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्सची कमतरता, करोना लसींचा तुडवडा जाणवत असताना, यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
करोनाची परिस्थिती सांभाळण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्षांकडून केला जात आहे, तर केंद्र सरकार आणि भाजप मिळून राज्याला जाणीवपूर्वक आरोग्य विषयक सेवांचा आणि गोष्टींचा कमी पुरवठा करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांकडून केला जात आहे.
यातच माजी मंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी, ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला असून, लसीकरण, रेमडेसिवीरबाबत भेदभाव सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात असल्याची तक्रार देखील त्यांनी केली असून, प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग सुरू असल्याचा दावाही शिवतारे यांनी केला आहे.
तसेच, पुण्यातील पुरंदर जिल्ह्यात ऑक्सिजन, रेमडेसिवरचा तुटवडा असून लसीकरणही थांबल्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात माझी भूमिका नाही. मात्र जिल्हाधिकारी, FDA यांच्या कारवाईवर संशय आहे. पुरंदर जिल्ह्यात १८०० रुग्ण असताना, फक्त २२५ रेमडेसिवीर मिळाले आहेत.
त्यांनी लसीकरणबाबतीतही आमच्यावर अन्याय असल्याचे सांगत, पुरंदर मध्ये जास्त धोका असतांना फक्त ३४ हजार लसीकरण झाले आहे. अन्य जिल्ह्यात मात्र दुपटीने लसीकरण झाले असल्याचा दावा करत, याबाबत आपण ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.