स्मार्ट सिटी प्रकल्पावरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट तुकाराम मुंढेंविरोधात केंद्राला पत्र लिहिलं होतं. या सर्व घडामोडीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही ही सचिवांची यंत्रणा केराच्या टोपलीत फेकून द्या, मंत्रालय की सचिवालय हा वाद कशाला हवा? सचिव पद्धतच बंद करुन टाका, पिन टू पियानो म्हणजे ए टू झेड ऑर्डर पण तुम्हीच काढायची, काम पण तुम्हीच करायची, मदतीचं वाटप सगळं तुम्हीच करायचं असा टोला त्यांनी भाजपा नेत्यांना लगावला.
तसेच तुकाराम मुंढे नागपूरात महापालिका आयुक्त म्हणून आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मग मी शिस्तीच्या मागे उभा आहे. एखाद्या अधिकाराच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? काही नियम, कायदे कडकपणाने अमलात आणले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे. आततायीपणा कोणीच करु नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित जोपासलं जात असेल तर चांगले आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असेल, तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरुन चालणार नाही असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली