नाशिक : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचे पडसाद आता राज्यातील कानकोपऱ्यात उमटू लागले आहेत. नाशिकमधील शिवसेनेच्या नगरसेविका किरण धराडे-गामने यांन याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहलं आहे.
मी ठाकरे गटाची नगरसेविका आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय. त्यात असा उल्लेख केला की, संजय राऊत यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेत. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आता जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. आव्हाड यांच्याविरोधात 72 तासात दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे मी पत्राद्वारे विनंती केली की, राऊत असो की आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. आम्ही शिंदे गटात सामिल होण्यासाठी तयार आहोत, असं किरण धराडे म्हणाल्या आहेत.
मी स्वत: शिवाय माझ्यासोबत चार नगरसेविका या शिंदे गटात प्रवेश करतील. पण, तुम्ही खोटे गुन्हे दाखल करू नका, असंही किरण धराडे म्हणाल्या. शिंदे गटाकडून बदनाम करण्याचं काम सुरू आहे. खोटे गुन्हे दाखल केले जातात. यासाठी आमची राजकीय हत्या झाली तरी चालेल. आमच्या नेत्यांवर निदान खोटे गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. ते खोटे गुन्हे तुम्ही मागे घ्या, आम्ही तुमच्या संघटनेत सहभागी होऊ, असा उपरोधित टोला नाशिक येथील नगरसेविकेने लगावला आहे.
राज्यात संजय राऊत यांच्या समर्थनार्थ आंदोलनं सुरू होती. आता जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ आंदोलनं सुरू आहेत. आज फक्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. उद्या आव्हाड, राऊत या नेत्यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी रस्त्यावर उतरतील, असंही त्या म्हणाल्या.