सातारा: सांगली आणि सातारा जिल्हाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर करण्यात आली होती. कोरोनाच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते. शेतकरी क्रांतिकारी पक्ष, मानवाधिकार पार्टी, श्रमिक मुक्त दल (लोकशाहीवादी ) या राजकीय पक्षांनी यानिवडणुकीला विरोध दर्शवला होता.मात्र सोमवारी सायंकाळी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. कारखान्यासाठी आज पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कऱ्हाडचे उपनिबंधक माळी, कोरेगावचे संजय सुद्रिक व महाबळेशवरचे जे.पी. शिंदे सहायक निवडूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचा प्रस्ताव निवडणूक प्राधिकरणाकडे दिला होता. त्या प्रस्तावाला काल संध्याकाळी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आज पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
शासकीय सुट्टीचे दिवस वगळण्यात येणार असून अर्ज भरण्यास परवानगी मिळणार आहे. आजचा मंगळवार, गुरुवार, शुक्रवार व पुढचा सोमवार आणि मंगळवार असे मोजके पाच दिवस अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. त्यानंतर दाखल अर्जांची छाननी होणार आहे. तीन ते १७ जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.त्यानंतर १८ जूनला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. २९ जूनला मतदान होणार आहे तर एक जुलैला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे . तब्ब्ल ४७ हजार १६० सभासदांची अंतिम यादी तयार झालेली आहे.
हे पण वाचा, कोरोनामुळे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लांबणीवर गेली होती.
मागच्या वर्षी होणारी ही निवडणूक कोरोनच्या पहिल्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आली होती. वर्षभरानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा एकदा या निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. मात्र आता कोरोनच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा मोठे संकट निर्माण झाले आणि निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी पुन्हा एकदा राजकीय पक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केली. कृष्ण साखर कारखाना स्थापनेपासून असणारे सभासद वयोवृद्ध आहेत आणि त्यांच्या जीवाला कोरोनाकाळात धोका निर्माण होऊ शकतो असे सर्वांचे म्हणणे होते.