धाराशिव : सबका साथ, सबका विकास, म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला मोठी मदत केली आहे. मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी धारशीवची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील. मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी धारशिवची जनता अर्चना पारील यांना प्रचंड मतधिक्याने विजयी करेल असा विश्वास माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केला.
यावेळी सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, मोदीजींच्या काळात धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे मंजूर झाली, आता प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. लवकरच काम सुरू होणार आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे करण्यास मोदी सरकारने मंजूरी दिली आहे. यामुळे या जिल्ह्यात ज्या काही विकासाच्या योजना झाल्या आहेत. त्या मोदी सरकारच्या काळात झाल्या आहेत. खरंतर विद्यमान खासदारांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्र सरकारकडून आणलेली आणि कार्यान्वित झालेली एक योजना दाखवावी, ते म्हणतील ते मी करण्यास तयार आहे. असं आवाहनही त्यांनी यावेळी विरोधकांना दिले.
विद्यमान खासदारांनी तक्रार करण्यापलीकडे काहीही केलेले नाही. यामुळे हा मतदार संघ मोदींच्या विचारांचाच खासदार निवडून देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यमान खासदाराने लोकसभेत सांगितले होते की, मोदीजी तुमच्याकडे बघून मला जनतेने 1 लाखांहून अधिक मताधिकयाने निवडून दिले आहे. मात्र नंतर त्यांच्याशीच गद्दारी केली, यामुळे जनता अशा निष्क्रिय खासदाराला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यात महायुतीने महिला शक्तीला उमेदवारी दिली आहे, मला विश्वास आहे की बोंबासुरांचा वध ही रणारागिनी केल्याशिवाय राहणार नाही. अर्चनाताईंना जिल्हा परिषदेच्या कामाचा अनुभव आहे, त्यांनी केलेले काम प्रभावी आहे, यामुळे जनता त्यांना निश्चित प्रचंड बहुमताने निवडून देईल असेही ठाकूर यांनी सांगितले.