मुंबई : राज्यात करोनामुळे हाहाकार उडाला असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची आकडेवारी वाढत असून, संपूर्ण लॉकडाऊन लावावा की नाही, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी व टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर, आता राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनीच असे संकेत दिले आहेत.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील अशाच प्रकारचे संकेत देत, राज्यात करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, साखळी तोडण्यासाठी १२ ते १३ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, असं वक्तव्य केलं आहे. तसेच मुश्रीफ यांनी यावेळी राज्यातील परप्रांतीय कामगारांना गावी न जाण्याचं आवाहन केलं आहे.
“राज्यात लॉकडाऊन जाहीर केला गेला, तरी सरकारकडून सर्व परप्रांतीय कामगारांची सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन कामगार मंत्री म्हणून मी तुम्हाला देतो”, असे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांची गरज लागणार आहे. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी गावी परतण्यासाठी रेल्वे स्थानकं आणि बस स्थानकांवर गर्दी करु नये”, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
दरम्यान, राज्यातील लॉकडाऊनची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे; पण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी केली जाईल, असंही सांगण्यात येत आहे. अद्याप याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.