मुंबई : राज्यात करोनामुळे हाहाकार उडाला असून, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची आकडेवारी वाढत असून, संपूर्ण लॉकडाऊन लावावा की नाही, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी व टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर, आता राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनीच असे संकेत दिले आहेत.
दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी, राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हे आजच मोठा निर्णय घेणार असून, त्याची नियमावली आजच जाहीर होईल, असे विधान केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अस्लम शेख यांनी सांगितले की, आम्हाला करोनाची साखळी तोडायची आहे, लोकांना सोबत घेऊन, त्यांचे सल्ले घेऊन याबाबत आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी एक चांगली एसओपी लागू करायची आहे. मला असं वाटतं की, आजच याबाबतची नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रामध्ये आजही परिस्थिती नियंत्रणात आहे, असे देखील शेख यांनी यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसात करोनारुग्ण संख्या प्रचंड वाढली असून, परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. तसेच लसीच्या पुरवठ्यावरून देखील केंद्र व राज्य सरकारमध्ये जुंपली आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, तसेच काल झालेल्या टास्क फोर्स सोबतच्या बैठकीत, राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यात १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णयावर विचार पक्का करण्यात आला आहे.