मुंबई : राज्यात महामारीच्या दिवसेंदिवस होणाऱ्या रुग्णवाढीमुळे बेड्स, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर्स, रेमेडीसीवर इंजेक्शन्स आणि लसींची उपलब्धता अपुरी आहे. यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होतानाचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक, मग ते केंद्रातले असो की राज्यातले एकमेकांवर सडकून टीका, आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
दरम्यान, काल (२३ एप्रिल) पंतप्रधानांनी, देशातील सर्वात जास्त महामारीचा संसर्ग फैलावलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची, दूरदृश्य प्रणालीद्वारे एक बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. त्यांनी राज्यातला करोना परिस्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली.
तसेच त्यांनी, राज्याला सध्या रेमडीसीव्हीर किती उपयुक्त आहे, ते सांगता येत नाही; पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली होती.
त्यांच्या या मागणीला आज पंतप्रधान मोदींनी सकारात्मक प्रतिसाद देत, राज्याला ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले असून, पंतप्रधानांचे राज्याचे हित लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेतल्याप्रकरणी आभार मानले आहेत.
रेमडेसिव्हीर तुटवड्याच्या समस्येविषयी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. आज केंद्राने राज्याला ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 24, 2021